Search
Sign In

भात शेती

भात शेती

कोकणातील हवामान, जमीन आणि भरपूर पडणारा पाऊस भाताच्या पिकाला पूरक आहे. अलिबाग मधील शेतकरी भात शेती प्रामुख्याने करताना आढळतो. खार व निमखार जमिनीत भाताचे पिक घेता येते. कोलम, रत्ना, जया, सुवर्णा, इंद्रायणी, अश्या अनेक जातींचा तांदूळ इथे पिकवला जातो.

भात लावणी :- 

भाताची शेती करताना १२ ते १५ सेमी खोल जमीन नांगरली जाते व ढेकळे फोडून जमीन सपाट व माती मऊ केली जाते. त्यानंतर पहिला पाऊस पडल्यावर खाचरात पाणी साठवले जाते व तीन वेळा उभी आडवी नांगरणी केली जाते. पूर्व मशागत झाल्यानंतर हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत किंवा कंपोष्ट खत घालतात. भाताचे पिक राब पद्धतीने व गादी वाफ्यात तयार करतात. राब पद्धतीने भात शेती करताना पावसाळया पूर्वी तयारी केली जाते. उन्हाळ्याच्या शेवटी जमिन सपाट करून त्यावर पाला पाचोळा पसरून जाळला जातो. जमीन भाजण्याची ही राब पद्धत परंपरेने चालू आहे. राब केल्याने तण, कीटक, रोगजंतू, व गवताचे बी जळून जाते व राखेचा उपयोग खत म्हणून होतो. पहिला पाऊस पडल्यानंतर राब भाजलेल्या जमिनीत बी पेरले जाते. गादी वाफ्यात पेरणी करताना जमीन भाजली जात नाही. प्रत्येक वाफ्यात शेणखत घालतात व पावसाळा सुरु होताच ओळीत निरोगी बी पेरतात. रोपास स्थानिक लोक “आवण” म्हणतात. पावसाच्या पाण्याने भरलेली भात खाचरे लाकडी नांगराने नांगरतात. जुलै तील मोठ्या पावसात चिखलणी करून रोपांची पेरणी करतात. लावणी साठी वाफा करून आधी रोपे तयार करून ठेवली जातात. खाचरात. २० x २० सेमी अंतरावर लावणी करतात.

भात कापणी व मळणी:-

लावणी नंतर दोन आठवड्याने बेनणी केली जाते व त्यानंतर दोन आठवड्यांच्या अंतराने आवश्यकते नुसार एक दोन कोळपण्या करतात. लावणी नंतर रोपांची मुळे चांगली रुजे पर्यंत २.५ सेमी खोल पाणी राहील अशी व्यवस्था करतात. नंतर दाणा परिपक्व होई पर्यंत पाण्याची पातळी ५ सेमी पर्यंत ठेवतात. अधूनमधून पाण्याचा निचराही करतात. पिक निसवण्या पूर्वी दहा दिवस व निसवल्या नंतर दहा दिवस पाण्याची पातळी हळू हळू कमी करतात. कापणी पूर्वी दहा दिवस अगोदर खाचरातील पाणी पूर्ण पणे काढून टाकतात. भात तयार झाल्यावर नोव्हेंबर महिन्यात कापणी करतात. त्यानंतर काही दिवस कापलेली भाताची रोपे सुकण्या साठी शेतात पसरून ठेवली जातात मग एकत्र भारे बांधले जातात मग झोडणी व मळणी करून तयार झालेला भात जवळच्या भात गिरणीतून दळून आणले लाते व तांदूळ करून साठवले जाते किंवा त्याची विक्री केली जाते. पारंपारिक पद्धतीने ही शेती आलिबाग मध्ये सर्वत्र केली जाते. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून दुबार पेरणी हि केली जाते. पण बरीच शेती पावसावर अवलंबून आहे त्यामुळे वर्षातून एकदाच भाताचे पिक घेता येते.

अलिबाग मध्ये भाताचे पिक मुबलक प्रमाणात येत असल्यामुळे येथील लोकांच्या अहारात प्रामुख्याने भात असतो. इथली तांदळाची भाकरी देखील प्रसिद्ध आहे.

  • 352
  • Farming
  • Comments Off on भात शेती

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password